Friday 2 January 2015

गुढी पाडव्याबाबतीत पसरवण्यात येणारा गैरसमज चुकीचा - अखिल भारतीय मराठा महासंघ

गुढी पाडव्याबाबतीत पसरवण्यात येणारा गैरसमज चुकीचा - अखिल भारतीय मराठा महासंघ
आता तरी डोळे अन मन निट उघडे ठेऊन माहिती ग्रहण करा.
गुढी पाडवा या सणाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युशी संबंध जोडणे चुकीचे आहे. हा सण कृषी संस्कृतीशी संबंधित असून ‘गुढी’ हा शब्द बहुजनांच्या संस्कृतीमधील आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथामध्ये व मराठी भाषेतील साहित्यामध्ये ‘गुढी’ हा शब्द इसवी सनाच्या १३व्या, १४व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते. संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे,
टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।
संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे
प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)
तसेच तुकारामांनी आपल्या अभंगातून किमान पाच वेळा गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे. कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळामधी आनंद आनंद झाला आणि त्याभरात लोकांनी गुढ्या उभारल्या.
गोकुळीच्या सुखा | अंतपार नाही लेखा ॥
बाळकृष्ण नंदा घरीं | आनंदल्या नरनारी ॥
गुढिया तोरणे | करिती कथा गाती गाणे ॥ २८३९.१-४ ॥¬
संत तुकाराम महाराजांनीच आणखी एकदा म्हटलेले आहे,
रोमांच गुढियाडोलविती अंगें | भावबळें खेळविती सोंगें रे |
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे | या विठोबाच्या अंगसंगें रे ॥
अ.क्र.१९२.५ ॥
गुढी पाडवा सणाबाबत काही लोकांनी समाजात चुकीचे गैरसमज पसरविले असून गुढी पाडव्याचा संभाजी महाराजांच्या मृत्युशी जोडला जाणारा संबंध चुकीचा असून संत तुकाराम महाराजांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला. छत्रपती संभाजीराजांचा जन्म १६५७ मध्ये झाला. याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्षाआधी वैकुंठवासी झालेल्या संत तुकारामांचा हा अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहिला गेला होता. म्हणून गुढी पाडव्याचा संभाजी महाराजांच्या मृत्युशी काहीही संबंध नाही.
उत्तर भारतात चांद्र मास पौर्णिमेला संपतात, म्हणजेच तिकडचे चांद्र मास पूर्णिमान्त असतात. दक्षिण भारतात चांद्र मास अमावस्येला संपून शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो. या पद्धतीनुसार महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा चैत्र महिन्याचा प्रारंभ ठरतो. चैत्र महिना हा बारा महिन्यांपैकी पहिला महिना होय. स्वाभाविकच, चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. ‘प्रतिपदा’ या शब्दाचेच पाडवा असे रूपांतर झाले आहे. त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस होय.
म्हणून गुढी पाडवा हा सण नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती साजरा करावा व हिंदू संस्कृतीचे जतन करावे. गुढ्या उभारून घरावरती भगवा ध्वज लावावा व या सणाचे औचित्य साधून गारपिटग्रस्त शेतकर्यांीनासुद्धा मदत करावी, असे आवाहन मराठा महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.
श्री. राजेंद्र कोंढरे श्री. गुलाब गायकवाड
राष्ट्रीय सरचिटणीस जिल्हाध्यक्ष, पुणे
वसंत ॠतुचे आगमन, कृषिजीवनाशी निकटचा संबंध, निसर्गाबरोबरचे नाते, नवीन वर्षाचा प्रारंभ इ. कारणांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेचे स्वागत करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करावा, या भावनेने गुढी पाडवा साजरा करण्याची कृषी परंपरा आहे. गुढी पाडवा साजरा करणे वा न करणे, ही बाब ऐच्छिक आहे. गुढी पाडवा साजरा करू इच्छिणार्यांाना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, त्या दिवसाकडे इतर दिवसांपेक्षा वेगळा असा शुभ मुहूर्त म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही. ज्यांना गुढी भगव्या पताकेच्या वा अन्य एखाद्या स्वरुपात उभी करण्याची इच्छा असेल, ते तसे करू शकतात.
गुढीविषयी काही तपशिल ः
1) गुढी हा शब्द अस्सल देशी आहे. त्याचे मूळ संस्कृत भाषेमध्ये नाही. याचाच अर्थ हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला तत्सम वा तद्भव शब्द नाही. स्वाभाविकच, हा शब्द वैदिक परंपरेतील नसून बहुजनांच्या संस्कृतीमधील आहे. शब्द बहुजनांच्या संस्कृतीमधील असल्यामुळे त्याच्या मागची संकल्पनाही बहुजनांचीच आहे. कानडी भाषेमध्ये ‘ध्वज’ या अर्थाने ‘गुडी’ असा शब्द असून ‘राष्ट्रध्वज’ या अर्थाने ‘नाडगुडी’ असा शब्द आहे. ही गोष्ट देखील ‘गुढी’ हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला नसून मूळचा बहुजनांच्या आणि प्रामुख्याने दक्षिण भारतीय बहुजनांच्या भाषेतील आहे, हे दर्शविणारा आहे.
2) मराठी भाषेमध्ये गुढी हा शब्द सुमारे इसवी सनाच्या तेराव्या-चौदाव्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते. उदा.-
संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटले आहे ः
टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।
संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे
प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)
संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे ः
आइकैं संन्यासी तो चि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगिं ।
गुढी उभिली अनेकीं । शास्त्रांतरी ।। ज्ञानेश्वरी ६.५२ ॥
‘स्मृतिस्थळ’ हा महानुभाव साहित्यामधील ग्रंथ सुमारे १४व्या शतकात लिहिला गेला आहे. या ग्रंथात ‘गुढी’ या शब्दाची ‘गुढ्या’ आणि ‘गुढेया’ ही रूपे पुढीलप्रमाणे आली आहेत ः
१ ः आणि तुम्ही गुढ्यासरीसें यावे ः (स्मृतिस्थळ ८३)
२ ः गुढेयासरिसें बैजोबा गाडेनिसिं निगाले ः (स्मृतिस्थळ ८५)
‘शिशुपाळवध’ हा महानुभाव साहित्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ होय. त्यामध्ये म्हटले आहे ः
घेत स्पर्शसुखाची गोडी ः श्रीकृष्ण आळिंगिला भुजादंडीं
तंव आत्मा उभितसे गुढीः रोमांचमीसें ॥ शिशुपाळवध ६० ।।
(वरील उदाहरणांतील जाड ठसा मूळचा नव्हे.)
राम आणि सीता यांचा विवाह झाल्यानंतर ते अयोध्येकडे निघाले असताना परशुराम आडवा आल्यानंतर राम आणि परशुराम यांच्यामध्ये झालेल्या संघर्षात रामाने परशुरामाचा पाडाव केला. त्यानंतर दशरथांनी सर्व वर्हातडासह अयोध्येत प्रवेश केला. त्या वेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज-पताका उभारल्याचे रामायणाने म्हटले आहे. ध्वज-पताका उभारल्या, म्हणजेच अयोध्येतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या, असा होतो.
संत तुकारामांनी आपल्या अभंगांतून किमान पाच वेळा गुढी / गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे.
कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला आणि त्या भरात लोकांनी गुढ्या उभारल्या, असे संत तुकारामांनी म्हटले आहे. त्यांचा यासंबंधीचा अभंग पुढीलप्रमाणे आहे ः
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा ।।
बाळकृष्ण नंदा घरी । आनंदल्या नरनारी ।।
गुढिया तोरणे । करिती कथा गाती गाणे ।। २८३९.१-४ ॥
कृष्णाने कालियावर मात केल्यानंतर त्याच्या गोपाळ मित्रांना अतिशय आनंद झाला. त्यांच्यापैकी जो चपळ होता, त्याच्या हातात गुढी देऊन त्याला कृष्णाने आनंदाची बातमी देण्यासाठी पुढे पाठविले, हे नोंदविताना तुकारामांनी म्हटले आहे,
पुढ पाठविले गोविंदें गोपाळा । देउनि चपळा हातीं गुढी |।४५५३.२।।
आनंदाची ही बातमी गोकुळात पोचल्यानंतर तेथे काय घडले, ते सांगताना तुकाराम म्हणतात,
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली गुढी हरुषें मात ॥
४५५५.१,२ ।।
त्यानंतर कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते, ते नोंदविताना तुकाराम म्हणतात,
नेणे वर्णधमर्जी आली समोरी | अवघी च हरी आळिंगिली ॥
हरि लोकपाळ आले नगरात | सकळांसहित मायबाप ॥
पारणे तयांचे जाले एका वेळे | देखिले सावळे परब्रह्म ॥
ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती | गुढिया उभविती घरोघरीं ॥
घरोघरीं सुख आनंद सोहळा | सडे रंग माळा चौकदारी ॥
४५५६.१-५ ॥
संत तुकारामांनीच आणखी एकदा म्हटले आहे,
रोमांचगुढिया डोलविती अंगें | भावबळें खेळविती सोंगें रे |
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे | या विठोबाच्या अंगसेंगें रे ॥
अ.क्र.१९२.५ ॥
(जाड ठसा मूळचा नव्हे.)
संत तुकारामांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म इसवी सन १६५७ मध्ये झाला. याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्षे आधी वैकुंठवासी झालेल्या संत तुकारामांचा हा अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहिला गेला होता.
उत्तर भारतात चांद्र मास पौर्णिमेला संपतात, म्हणजेच तिकडचे चांद्र मास पूर्णिमान्त असतात. दक्षिण भारतात चांद्र मास अमावस्येला संपून शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो. या पद्धतीनुसार महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा चैत्र महिन्याचा प्रारंभ ठरतो. चैत्र महिना हा बारा महिन्यांपैकी पहिला महिना होय. स्वाभाविकच, चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. ‘प्रतिपदा’ या शब्दाचेच पाडवा असे रूपांतर झाले आहे. त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस होय.
महाराष्ट्रातील निसर्गचक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ॠतूचे मानले जातात. शिशिर ॠतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये वसंत ॠतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. या पालवीला ग्रामीण भागात ‘चैत्र-पालवी’ असे म्हटले जाते. याचा अर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस वसंत ॠतूच्या आगमनाचा द्योतक आहे. तो चै. पालवीच्या आगमनाचा दिवस असल्यामुळे कृषिसंस्कृतीशी निगडित आहे.
इसवी सन ७८ पासून ‘शके’ या कालगणनेचा जो प्रारंभ करण्यात आला आहे, त्या कालगणनेनुसार नव्या वर्षाची सुरवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला होतो.
सौर पद्धतीच्या कालगणनेनुसार वर्षाची नोंद करण्याच्या बाबतीत भारत सरकारने ‘शके’ या कालगणनेचाच स्वीकार केला आहे. या कालगणनेनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस येतो.
गुढी पाडवा हा सण महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांतूनही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात साजरा केला जातो.
या दिवशी महाराष्ट्रात गुढीची पूजा केली जाते. तिच्या गळ्यात हार घातला जातो. हे पाहता या दिवशी गुढीचा अनादर केला जात नाही, तर तिच्याविषयी आत्यंतिक आदर व्यक्त केला जातो.
गुढीसाठी स्त्रियांची वस्त्रे वापरणे, हा स्त्रियांचा अनादर असण्यापेक्षा मातृसत्ताक अथवा स्त्रीसत्ताक समाजपद्धतीमध्ये स्त्रियांना जे प्राधान्य दिले जात होते त्याचे द्योतक असल्याची शक्यता आहे.
गुढीच्या टोकावर पालथे ठेवले जाणारे भांडे हे राणीच्या मस्तकावर ठेवल्या जाणार्या मुकुटाचे प्रतीक असू शकते.
चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कडू लिंबाच्या पानांचा उपयोग कोणत्या ना कोणत्या प्रकारे करण्याची पद्धत महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये आढळते. या पानांचा थोडा का होईना रस चाखण्याची वा पिण्याची प्रथा या राज्यांमध्ये आहे. या दिवशी कच्च्या कैरीचे पन्हेही बनविले जाते. याचा अर्थ कडू आणि आंबट रस अनुभवले जातात. शिवाय गोड, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात असतातच. याचा अर्थ, या दिवशी, निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चावींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख-दुःख वगैरे प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे, असे वर्षाच्या पहिल्या दिवशी सुचविण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवांमुळे घडते, असे मानता येते.

No comments:

Post a Comment